मराठी-अनुवाद — डॉ. वसुधा सहस्रबुद्धे
किती वेळा ह्यांना समजावलं थोडं शांतपणे, धीराने ऐकून घ्या न ! आता आपल्या मुलाचं लग्न झालं आहे. आपल्या घरांत सून आली आहे . आपल्याला नातू झाला आहे. आज एक बरं झालं विभा गोलूला त्याच्या आजीला भेटायला घेऊन गेली आहे. बाप लेकाचं भांडण ऐकून तिला काय वाटलं असतं ? ” केस पिकले आहेत पण ताठा तसाच आहे. नितीनच्या दोन गोष्टी ऐकल्या असत्या तर काय आकाश कोसळलं असतं ! “
सुशीलाच्या मनात उलटसुलट विचारांची गर्दी झाली होती. तिला क्षणभरही चैन पडत नव्हतं. बेचैन होऊन ती स्वयंपाक करू लागली.
दोघेजण केव्हा घरी येतील कोणास ठाऊक, काही एक न खाता बाहेर निघून गेले. नितीनला सुद्धा आत्तापासूनच स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं. कधी वडिलांचं सुद्धा ऐकावं. एकीकडे विचारांचं मंथन चाललं होतं आणि स्वयंपाक घरातून पक्वानांचा सुगंध येऊ लागला.
माणूस एकटा असला की जास्तच विचार करू लागतो. कारण विचार करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा अडथळा नसतो. हळू हळू संध्याकाळ झाली.
दरवाज्याची बेल वाजली. नितीन आला पण गाल फ़ुगलेलेच होते . म्हणून काही एक न बोलता त्याच्या टेबलासमोर दही बटाटा पुरी ठेवली आणि वळू लागले.तेव्हड्यात पाठीमागून नितीनचा आवाज ऐकू आला ,” सॉरी आई, मला बाबांशी असं बोलायला नको होतं . मागे वळून नितीनशी बोलण्याचा विचार करत होते तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. राजेशच्या कपाळावर अजूनही आठ्या होत्या. म्हणून न बोलता शेवयांची खीर टेबलावर समोर ठेवली आणि वळले तर माझा हात पकडून म्हणाले,” ऐक ना , मला वाटतं आता नितीनला त्याचे निर्णय स्वतः घ्यायला संधी द्यायला हवी ना मला !!
राजेशच बोलणं ऐकून सुशीलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते लपविण्यासाठी ती पदराने पुसू लागली.
तिला थांबविता राजेश म्हणाले ,” अग , हे काय ! तू तर आमचा सेतू आहेस आणि आणि सेतूच्या पायात एवढा ओलावा चांगला नाही बरं का !!”
-0-